जिल्ह्यासाठी खतांचे एकूण २.२१ लाख मे.टन आवंटन मंजूर..


गुणवत्तापूर्ण, दर्जेदार कृषी निविष्ठासाठी 17 भरारी पथके नियुक्त..

दक्ष न्युज, प्रतिनिधी

नाशिक: खरीप हंगाम २०२४ करिता जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असून, शासनाकडून खतांचे एकूण २.२१ लाख मे.टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. तसेच कृषी निविष्ठाच्या विक्रीसंदर्भात नियंत्रण ठेवण्याकरिता 17 भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी माधुरी गायकवाड यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, जिल्ह्याकरिता कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमुग, तुर, मुग व उडीद, इ. पिकांच्या मागणीनुसार बियाणे पुरवठा सुरु झाला आहे. जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे. खरीप हंगाम २०२४ करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण २.२१ लाख मे.टन आवंटन नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. दि. २७ मे २०२४ अखेर जिल्ह्यात युरिया खत ५५३७२ मे.टन, डीएपी ११९५१ मे.टन, एमओपी २३६१, एसएसपी १३९५८ मे.टन व संयुक्त खते ८३३८६ मे.टन असे एकूण १६७०२८ मे.टन खत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील किरकोळ खत विक्रेत्यांकडे दैनंदिन उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांची माहिती कृषिक या मोबाईल अॅपवर चावडी या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रकात म्हटले आहे, कृषी निविष्ठा गुणवत्ता व दर्जाची हमी देणा-या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहोरबंद पाकिटे/पिशव्या/बाटल्या असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. शेतकरी बांधवांनी परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच व पक्क्या पावतीवरच कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. तसेच अनुदानित रासायनिक खताची खरेदी ही e-POS मशिनद्वारेच करावी. कमी वजनाच्या निविष्ठा व पाकिटावरच्या छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री करणे तसेच मागणी व्यतिरीक्त इतर निविष्ठांची शेतकऱ्यांना सक्ती करणे हे बेकायदेशीर असून याबाबत कृषि विभागाकडे तसेच वजनेमापे निरीक्षकांकडे तक्रार नोंदवावी.

पत्रकात म्हटले आहे, विभाग व जिल्हास्तरावर प्रत्येकी 1 आणि तालुकास्तरावर प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 17 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठाबाबत काही तक्रार असल्यास ७८२१०३२४०८ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

कृषी निविष्ठा बाबत कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच कृषी विभागाचे क्षेत्रीय पातळीवर कार्यरत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *