संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळाचे उद्या प्रस्थान
दक्ष न्यूज प्रतिनिधी: प्रभाकर गारे
नाशिक : आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांच आराध्य दैवत अखीलकोट ब्रह्मांडनायक पंढरीस पांडुरंग परमात्माच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील पालखी सोहळे व असंख्य वारकरी, भाविक, भक्त व दिंड्या घेऊन पायी वारी करत भूवैकुंठ पंढरपूरला जातात, त्यात मानाच्या तिसऱ्या क्रमांकाची पालखी अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराज यांची होय. भक्तिमय वारकऱ्यांच्या समवेत व भव्यदिव्य स्वरूपात उद्या गुरुवार दि. २० जून २०२४ रोजी दुपारी ०२ वाजता विश्वगुरू श्रीनिवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधि संस्थान त्र्यंबकेश्वर ते कुशावर्त मार्गे आद्यजोतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराचा निरोप घेऊन २७ दिवसाच्या प्रवासासाठी “निवृत्तीराया निवृत्तीराया । सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया ।।” चा वारकरी भाविक भक्त गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवनार आहेत. उद्या सायं गुरुगृही अर्थात “गहिणीप्रसादे निवृत्ती दातार ।।” या अनुग्रहांनव्ये श्री निवृत्तिनाथ महाराज यांचे गुरु गहिनीनाथ यांच्या समाधि स्थळी अर्थात महानिर्वाणी आखाडा, पेगलवाडी त्र्यंबकेश्वर येथे पहिला मुक्काम असणार आहे. तेथे सायं हरिपाठ, रात्री किर्तन त्र्यंबककरांच्या वतीने भव्य महाप्रसाद आयोजित केलेला आहे. यावर्षीही प्रतिवर्षाप्रमाणे हजारो भाविक उपस्थित असणार आहे.
यावेळी महाराष्ट्र शासनाने संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी व श्री तुकोबांराय महाराज देहू पालखी सोहळ्याप्रमाणे आवश्यक निधी अंतर्गत निवृत्तिनाथ महाराज, सोपानदेव महाराज, आदीशक्ती मुक्ताई महाराज या तिन्हीही संस्थान पालखी सोहळ्याचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समावेश केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार. शासन व संस्थान संयुक्त विद्यमाने निर्मलवारी, वाँटरप्रूफ मंडप, जनरेटर व्हॅन, वैदयकीय सेवा, ॲम्बुलन्स, वारकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा यासारख्या दैनंदिन सुविधा देणार आहे. या
२७ दिवसाच्या खडतर प्रवास पण देवाच्या नामस्मरनात सर्वांना आनंदमय होवो. वारकऱ्यांची सर्व व्यवस्था होवी अशी ही सर्व वारी ही निर्विघ्नपणे होवो हीच एक विश्वगुरूंकडे प्रार्थना.