देशमुखांवर आरोप करणारे परमवीरसिंग देश सोडून पळून गेले अशांवर केंद्रीय एजन्सीने का विश्वास ठेवावा – जयंत पाटील


  • राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा तीन दिवस नाशिक जिल्हयात…

नाशिक: दक्ष प्रतिनिधी

भुजबळसाहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजपसरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीरसिंग देश सोडून पळून गेले आहेत त्यांच्या आरोपावर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होते आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळसाहेबांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

भुजबळसाहेबांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे.आपले फक्त ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.

भुजबळसाहेब अफाट काम करत आहे. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. हे कधी शक्य होईल जेव्हा आपले संघटन मजबूत असेल असेही जयंत पाटील म्हणाले.

बुथ कमिट्यांचे काम सक्षमपणे करा त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करू.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळसाहेबांच्या पाठपुराव्याने. भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही असेही गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले.

यावेळी आलेल्या अभिप्रायचे वाचन जयंत पाटील यांनी केले.संवाद परिवार संवाद यात्रा नवव्या दिवशी नाशिक जिल्हयात दाखल झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला – लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी यावेळी घेतला.

यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खवटे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, सामाजिक न्यायविभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत सिरसाट, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकबर शहा, येवला संपर्क प्रमुख बाळासाहेब लोखंडे, महिला तालुकाध्यक्षा सोनाली कोथमे, युवक तालुकाध्यक्ष मोहन शेलार आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *