राज्यात 22 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता


मुंबई: दक्ष विशेष प्रतिनिधी

राज्यातील 22 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणासंदर्भातील तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्याबाबत आरोग्य विभागाने आदेश जारी केले आहेत.


✓ मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांची निश्चिती करेल.


✓ उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत पुढीलप्रमाणे सूट देण्यात आली आहे.


✓ त्यानुसार सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.


✓ सर्व सार्वजनिक उद्याने व मैदाने आता व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग आदींसाठी खुली करण्यात आली आहेत.


✓ सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्यात येतील. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सूचना दिली आहे.


✓ सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.


✓ जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. मात्र, ती शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.


✓ सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *