यास चक्रीवादळाचे परिणाम:बंगाल-ओडिशाच्या अनेक भागात पावसाची हजेरी,
बिहार-झारखंडमध्ये सतर्कतेचा इशारा ताशी 155 किमी वेगाने वारे वाहू शकतात
तौक्ते चक्रीवादळानंतर देशाला आता यास चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे बुधवारी हे चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे बंगालमधील दिघा आणि ओडिसातील भुवनेश्वर चांदीपूरसह अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बिहार आणि झारखंड राज्यालादेखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यास चक्रीवादळ हे सोमवारी रात्रीपासून धोकादायक बनत चालले आहे. त्यामुळे आज बंगालमधील मेदिनीपूर, 24 परगणा आणि हुगळी येथेही पाऊस पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) सोमवारीच पूर्व मेदिनीपूर आणि दिघाचे अनेक भाग रिकामे करायला सुरुवात केली आहे.
ताशी 155 किमी वेगाने वारे वाहू शकतात
यास चक्रीवादळ हे पारादीप आणि सागर बेटावर बुधवारी धडकणार असून यामुळे वारे हे 155 किमी वेगाने वाहतील. दरम्यान, समुद्रातदेखील 2 मीटर ते 4.5 मीटर उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रकिनार्यावरुन गेल्यानंतर बुधवारी दुपारपर्यंत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेदेखील हवामान खात्याने सांगितले आहे.