ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर होणार कारवाई – पालकमंत्री छगन भुजबळ


ब्रह्मगिरी बचाव समितीच्या सदस्यांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट

नाशिक: प्रतिनिधी

ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांना दिले.

ब्रह्मगिरी,सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या उत्खननाबाबत आज ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ब्रम्हगिरी बचाव समितीचे निशिकांत पगारे, महंत गणेशानंद सरस्वती, दत्तात्रय ढगे, जगबिरसिंह, प्रकाश निकुंभ, कुलदीप कौर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रम्हगिरी बचाव समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पहिला किल्ला ब्रह्मगिरी मेटघर. येथे सुपलीचा मेट या आदिवासी बांधवांच्या पाड्याखाली जिलेटिन कांड्यांचा वापर करून सुरुंग लावून ब्रह्मगिरीच्या पोटात ‘ब्रम्हा ग्रीन’ या प्रकल्पांतर्गत खाजगी विकासकाने पेसा व वनहक्क कायद्यांचा भंग करून अवैध उत्खनन केले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेत अवैध उत्खननामुळे माळीण सारखी दुर्घटना होण्याचा संभव असताना वनविभाग, महसूल विभाग, खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रशासन दुर्लक्ष केले आहे. ब्रह्मगिरीच्या दुर्घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असतांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असणाऱ्या नाशिक जवळील संतोषा, भागडी पर्वतरांगेत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध उत्खननाने संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत केलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात अवैध उत्खननाने सह्याद्रीचे लचके तोडले जात आहेत. यामुळे वन्यजीव,पर्यावरण,जैवविविधता यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊन संपूर्ण जीवसृष्टीस याचा धोका निर्माण झालेला असल्याचे म्हटले आहे.

तसेच युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेचे संवर्धन,संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असून सह्याद्री पर्वतरांगेत आता सुरुंग/ जिलेटीन कांड्यांचा वापर, खोदकाम,खाणकाम बांधकास पूर्णतः बंदी आणावी. आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्काचे रक्षण करून योग्य तो कायदा करून सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर उतारावरील जमिनीचा राज्याचे हरित अच्छादन ३३ टक्यांाद पर्यंत वाढविण्यासाठीच उपयोग करावा. ब्रह्मगिरी उत्खननातील सर्व दोषींची चौकशी करून कारवाई करावी. ब्रह्मगिरी,सह्याद्री उत्खननात वापरल्या गेलेल्या जिलेटिन कांड्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

या प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची दखल घेऊन ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. लवकरच या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी बचाव समितीच्या सदस्यांना दिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *