माणूस म्हणून प्रत्येकाला न्याय दिल्यास ‘महाज्योती’ चे ध्येय साध्य होणार- मंत्री छगन भुजबळ


  • महाज्योती आयोजित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोगास नाशिककरांचा उदंड प्रतिसाद

दक्ष न्यूज : करणसिंग बावरी

  • देशातील नागरिकांना अंधश्रद्धे पासून दूर ठेवण्यासाठी महात्मा फुले यांचे ‘तृतीय रत्न’ नाटक अतिशय उपयुक्त व प्रभावी – मंत्री छगन भुजबळ

नाशिक : देशातील नागरिकांवर आजही काही प्रमाणात अंधश्रेद्धेचा पगडा कायम असून तो दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेलं तृतीय रत्न हे नाटक अतिशय उपयुक्त आणि प्रभावी ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले व संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेच्या नाशिक विभागाच्या वतीने लोकजागृती संस्था प्रस्तूत महात्मा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाटकाचा प्रयोगाचे नाशिकच्या कालिदास कलामंदिर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. महाज्योती संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर जनजागृतीच्या उद्देशाने महात्मा फुले यांनी लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाच्या प्रयोगांचे नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाचा सहावा प्रयोग आज नाशिक शहरात पार पडला.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमे, समाज कल्याण विभाग नाशिक उपायुक्त भगवान वीर, नाशिक विभागाच्या वरिष्ठ सहायक सुवर्णा पगार,पल्लवी कडू, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने,कविताताई कर्डक संतोष डोमे, जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, संतोष खैरनार, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे,जगदीश पवार, सुषमा पगारे,संजय खैरनार,माजी सनदी अधिकारी बी जी वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पूर्वी बहुजन समाजातील नागरिकांना शिक्षणाचा हक्क नसल्याने तत्कालीन ब्राम्हण व्यवस्थेकडून अंधश्रद्धेत राहिलेला बहुजन समाज हा नाडला जात होता. महात्मा फुले यांनी म्हटले आहे की, ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी समान आहेत. सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून, मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे. या विचारांचा अंगिकार हा प्रत्येकाने केला पाहिजे. महात्मा फुले यांचा लढा हा अनिष्ठ रूढी व परंपरा या विरूद्ध होता. समाजाची उन्नती व्हावी यासाठी महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना सुद्धा स्त्रीक्षिणाची मूहर्तमेढ रोवली. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आरक्षण दिले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधातून यास योग्य आकार दिला आहे. असे विचार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

ते म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले हे देखील नाटककार होते. त्यांनी लिहिलेलं तृतीय रत्न हे मराठीतील पहिल नाटक असून समाजात जनजागृती करण्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी लिहिलेलं हे पहिलं नाटक होतं. फुले, शाहू व आंबेडकर यांची विचारसरणी ही धर्माच्या विरूद्ध नव्हती तर ती अन्यायाविरूद्ध होती. महात्मा फुले यांचा ब्राम्हणांना कधीही विरोध नव्हता तर ब्राम्हणवादाला त्यांचा कायम विरोध होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सुद्धा सेनापती म्हणून समाजातील सर्वच जातीधर्माचे लोक होते. व त्यांचा लढा हा सुद्धा अन्यायाविरूद्धच होता. या सर्वच महापुरूषांचे कार्य आजही आपल्याला पथदर्शी आहे. सध्या राजकारणात धर्माच्या नावाखाली धंदा सुरू झाला आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा माणूस असतो मात्र त्याला नंतर धर्म आणि जातीव्यवस्थेत अडकवले जाते. माणसाचं हे माणूसपण टिकविण्यासाठी महाज्योतीने सुरू केलेल काम अतिशय आदर्श असून महाज्योतीचे ध्येय निश्चितपणे साध्य होईल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या नाट्यप्रयोगास नाशिक येथील नॅबच्या शाळेतील २५ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रसिकांसोबत उपस्थित राहून तृतीयरत्न या नाटकाच्या प्रयोगाचा आनंद घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *